गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांना दिलासा..
⚡बांदा ता.०४-: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर इन्सुली येथील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर वाढणारी वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा, झाडाझुडपे व वाढलेले गवत साफ करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी यासाठी संबंधित यंत्रणेकडे सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर रस्त्याची साफसफाई करण्यात आली.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे इन्सुली परिसरातील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडेझुडपे व साचलेला कचरा यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता वृषाली पाटील यांच्याशी सातत्याने संपर्क साधत तात्काळ साफसफाई करण्याची मागणी केली होती.
साफसफाई झाल्याने रस्ता अधिक मोकळा व स्वच्छ दिसत असून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत होण्यास या कामाचा फायदा होणार असल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच सणासुदीच्या काळात रस्त्यांची नियमित साफसफाई व देखभाल करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यामुळे नितीन राऊळ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
फोटो:-
इन्सुली येथे जुन्या महामार्गची साफसफाई करण्यात आली.
