नसबंदीच्या निधीच्या वापराबाबत मनसे आक्रमक ; ७ दिवसांत कारवाई न झाल्यास पालिका गेटसमोर कुत्रे बांधण्याचा इशारा…
मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहरामध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुत्र्यांच्या नियमित आणि योग्य नसबंदीचा अभाव, वाढते हल्ले आणि शासकीय रुग्णालयातील रेबीज प्रतिबंधक लसींचा तुटवडा याविरोधात मनसेने वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मालवण नगरपालिकेला याबाबत निवेदन देण्यात आले असून, ७ दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
मालवण शहरातील विविध भागात भटके कुत्रे नागरिकांचा व लहान मुलांचा पाठलाग करत असून त्यांच्यावर हल्ले करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, कुत्र्याचा चावा घेतल्यानंतर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक असणारी इंजेक्शने व औषधे अनेकदा उपलब्ध नसतात किंवा त्यांचा साठा संपलेला असतो. प्रशासनाच्या या बेफिकीर कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी प्रति कुत्रा ठरावीक निधी मंजूर केला जातो. परंतु, प्रत्यक्षात नसबंदी न करता केवळ कागदोपत्री काम दाखवून निधीचा गैरवापर केला जात आहे का, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. नसबंदी झालेल्या कुत्र्यांची संख्या, त्यासाठी झालेला खर्च आणि संबंधित कंत्राटदार वा संस्थेची सर्व माहिती नगरपालिकेने पारदर्शकपणे जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांची तातडीने गणना करण्यात यावी, शास्त्रीय व योग्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांची नसबंदी मोहीम राबवावी, आतापर्यंत किती कुत्र्यांची नसबंदी झाली आणि त्यावर किती खर्च झाला, याचा सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करावा, कुत्र्यांच्या नसबंदीसाठी मंजूर झालेल्या संपूर्ण निधीचा हिशोब नागरिकांसमोर मांडावा, नागरिक व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तात्काळ प्रत्यक्ष पावले उचलावीत. शासकीय रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक इंजेक्शने आणि आवश्यक औषधे सतत उपलब्ध राहतील याची खात्री करावी अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
मनसेने मालवण नगरपालिकेला या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत प्रत्यक्ष आणि ठोस नसबंदी मोहीम सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली जाईल. कुत्रे पकडणे ही नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. हे काम प्रशासनाला जमत नसेल, तर मनसे सैनिक स्वतः भटक्या कुत्र्यांना पकडून पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधतील, असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे.
