मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यावरून उबाठा शिवसेना आणि सत्ताधारी शिंदे शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मालवण तालुक्यात माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात रस्त्यांची कामे झाली, हे मान्य आहे. मात्र, ही कामे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आगाऊ मंजूर करून घेतली होती व कामांचे कंत्राटदार दत्ता सामंत होते, असा दावा मयेकर यांनी केला आहे, त्यामुळे ‘आम्ही नव्हतो; मग त्या रस्त्यांना दोन-तीन वर्षातच मोठं मोठे खड्डे का पडतात?’ असा सवाल मयेकर यांनी उपस्थित करत श्रेयाचे राजकारण नको, कामाचे उत्तर द्या,’ असे आव्हान दिले आहे.
मालवण-कुडाळ मार्गावरील खड्डे बुजविण्याचे मोठे श्रेय घेण्यात आले; मात्र आज पुन्हा त्याच रस्त्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगत तपस्वी मयेकर यांनी कामाच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खड्डे बुजविण्याचा गाजावाजा झाला, मग पुन्हा खड्डे पडल्याचे श्रेय कोण घेणार? असा टोला त्यांनी लगावत मंजूर निधी, तांत्रिक मंजुरी, डीपीआर, कंत्राटदारांना घातलेल्या अटी-शर्ती आणि प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता याबाबत जाहीर पत्रकार परिषद घेण्याचे आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
आमदारांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे सांगितले जाते. मात्र, त्या निधीतून प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, योग्य बजेटिंग आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत, असा आरोप मयेकर यांनी केला. लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर तो योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने ठोस नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत त्यांनी म्हटले. मालवण शहरातील अद्याप ठोस प्रस्ताव दिसत नसल्याचे अर्धवट राहिलेल्या विकासकामांचा दाखला देताना मयेकर यांनी भाजी मार्केट आणि स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचा उल्लेख केला. कोट्यावधी रुपये खर्च होऊनही या प्रकल्पांचे केवळ सांगाडे उभे असल्याची टीका त्यांनी केली. भुयारी गटार योजना, नवीन नळपाणी योजना आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवरही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ‘कागदावरची व्यवस्था आणि प्रत्यक्षातील व्यवस्था यात मोठी तफावत आहे,’ असा आरोप त्यांनी केला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनातील काही रक्कम रोख स्वरुपात घेतली जात असल्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा करून याची चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जे कंत्राटदार तुमचे ऐकतात
तेच काम घेतात. मग क्वालिटी कंट्रोल आणि नियम कुठे जातात?’ असा सवाल करत मयेकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेचे निकष समान असायला हवेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. शहरातील मोकाट जनावरे, वाढता डासांचा प्रादुर्भाव, फवारणीचा अभाव, अपुरी स्वच्छता व्यवस्था यावरही त्यांनी लक्ष वेधले. पंधरा दिवसांपूर्वी उपोषण करूनही प्रशासनाला जनतेच्या प्रश्नांची दखल घेण्यास वेळ मिळालेला नाही, अशी टीका त्यांनी केली.
