ग्रामपंचायत पाठपुराव्याला यश:सर्व घरे लवकर पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणार, सरपंच संदिप मेस्त्री..
⚡कणकवली ता.२१-: तालुक्यातील कलमठ गावातील बेघर लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेतून पुन्हा एकदा नवीन आर्थिक वर्षात ४१ घरकुले मंजूर झाली आहेत. शुक्रवारी कलमठ ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत मंजूर घरकुल लाभार्थी यादीचे वाचन करण्यात आले.
कलमठ ग्रामपंचायतीने गेल्या वर्षी बेघर आणि भूमिहीन गरजू लाभार्थींसाठी एकत्रित घरकुल प्रकल्प पूर्ण केला होता. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन योजनेतून जमीन मिळण्यासाठी देखील अनुदान प्राप्त केले होते.
यावर्षी देखील प्रधानमंत्री आवास योजनेमधून नव्याने मंजूर झालेली घरकुले पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. भूमिहीन असलेल्या लाभार्थींसाठी जमिनीचे प्रस्ताव लवकर करून ते पूर्णत्वास नेऊ, असा विश्वास सरपंच संदिप मेस्त्री यांनी व्यक्त केला.
गावातील सर्व मंजूर घरकुले लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणार असल्याचेही सरपंच संदिप मेस्त्री यांनी सांगितले.
दरम्यान, कलमठ गावातील गरजू लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाल्याबद्दल गावाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी उपसरपंच रवींद्र यादव, स्वप्नील चिंदरकर, दिनेश गोठणकर, नितीन पवार, हेलन कांबळे, सचिन खोचरे, स्वाती नारकर, प्रियाली आचरेकर आणि श्रेयस चिंदरकर उपस्थित होते.
