बबन साळगावकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी..
⚡सावंतवाडी, ता.२१-: सावंतवाडी नगरपरिषदेला कायमस्वरूपी व सक्षम मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी बबन साळगावकर यांनी महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणें यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून विविध विकासकामांना विलंब होत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच प्रशासनात एकसंघता नसल्याने नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून, वारंवार तक्रारी करूनही त्यावर समर्पक उपाययोजना होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेसाठी एक सक्षम, कार्यक्षम आणि कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करून शहराच्या प्रशासकीय कामकाजाला गती द्यावी, अशी मागणी साळगावकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
