⚡कणकवलली ता.२३-: आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर उतरून जोरदार चक्काजाम आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
शेतकऱ्यांनी “आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”, “आंबा-काजू शेतकरी उपाशी, सरकार तुपाशी” तसेच “कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा तीव्र घोषणा देत सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
हे आंदोलन शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंबा व काजू पिकांचे नुकसान, दराचा प्रश्न आणि शासनाकडून अपेक्षित मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याचे यावेळी दिसून आले.
या आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक, संदेश पारकर, बाळू मेस्त्री, उत्तम लोके, गणेश गावकर, यांच्यासह सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार काजु बागातदार शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
