वेळागर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यवसायिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे…

मालवणात पोलिसांचे निर्देश..

⚡मालवण ता.०५-:
वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर येथील समुद्रात पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ‘शक्ती’ वादळाच्या धोक्यामुळे बंदर विभागाने दोन नंबरचा धोक्याचा बावटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर मालवण किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांनी वेळागर सारखी दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे कडक निर्देश जिल्हा पोलिस प्रशासनाने पर्यटन व्यवसायिकांच्या बैठकीत दिले.

वेळागर येथील घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांनी किनारपट्टी भागातील पर्यटन व्यावसायिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने येथील पोलिस ठाण्याच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, सुशांत पवार, श्री. पेडणेकर यांनी बंदर जेटी, दांडी, चिवला बीच, तारकर्ली, देवबाग सह अन्य प्रमुख पर्यटन स्थळांवरील व्यावसायिकांची तातडीची बैठक घेतली.

वेळागर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे आणि नियमांचे पर्यटन व्यवसायिकांनी काटेकोरपणे पालन करावे. मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र असून ते सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवबाग आणि जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्याची हवामानाची स्थिती पाहता पर्यटकांच्या आणि व्यावसायिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, अशा सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत.

समुद्रात सध्या धोका असल्याने पर्यटकांनीही जलक्रीडा प्रकारात भाग घेणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. समुद्रात वादळसदृश परिस्थिती असल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी पॅरासेलिंग सारखे सर्व साहसी जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

You cannot copy content of this page