मंगेश तळवणेकर:गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळावी…
⚡सावंतवाडी ता.०४-: गणेश चतुर्थीला कोकणात येणाऱ्या चाकरमान्याची संख्या लक्षणीय असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांना गावी येण्यास, गणेशोत्सवाच्या बाजाररहाटासाठी बाजारात येणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने एष्टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी असे मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवले आहे त्यात असे म्हटले की,महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या रास्त मागण्या असूनही सरकारने त्याकडे पुर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाची कटाक्षाने दखल घेणाऱ्या सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांचे साफ पाठ फिरवलेली आहे.
एस.टी. चालक व वाहक ज्यावेळी खेडगावात वस्तीला जातात तेव्हा त्यांना झोपायला निवारा नाही, जेवण घराकडून सकाळी किंवा दुपारी दिलेले शिळे अन्न खावे लागते, टॉयलेटची व्यवस्था नाही, तोंड धुवायला पाणी सुद्धा नसते, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे, तुटपुंज्या पगारात त्यांना 20-20 तास ड्युटी करावी लागते. कुटुंबापासून दूर शहरात भाड्याने खोली घेवून राहणे, मुलांच्या शाळेची फी भरणे करणेही त्यांना शक्य होत नाही. वेळप्रसंगी जीव धोक्यात घालूनही एस.टी. चे कर्मचारी आपली सेवा देत असतात.
अशाप्रसंगी अत्यंत महत्त्वाची सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांकडे शासनाचे होणारे दुर्लक्ष असंतोष कारण घडले असून त्यामुळे संप करणे भाग पडले आहे. सरकारी नोकरांच्या संपाकडे तात्काळ लक्ष देणाऱ्या शासनाने आता तरी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेवून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या मान्य कराव्यात व गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळावी. अन्यथा अन्य संघटना देखील आंदोलनात उतरणार असल्याने याचा फटका संपुर्ण महाराष्ट्राला बसणार आहे.
