येत्या पुढील काळात तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला कारभार सुधारावा…

आशिष सुभेदार:अन्यथा तीव्र आंदोलन करू..

⚡सावंतवाडी ता.०४-: जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन मगच कामे केली जातात त्यामुळे कामांची गुणवत्ता राहत नाही. याची प्रचिती मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळा दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा आली असून यावर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व मंत्र्यांचा कोणताही अंकुश नाही. येत्या पुढील काळात तरी या विभागाने आपला कारभार सुधारावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला आहे.


मालवण येथील नौदलाने उभारलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला प्रथम कारणीभूत जिल्हयाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. या विभागात टक्केवारी घेऊनच कामे दिली जातात त्यामुळे कामांची गुणवत्ता राहात नाही. प्रत्येक कामाचे वाढीव टेंडर काढून त्यावरील रक्कम लाटण्याचे प्रकार कित्येक वेळा उघड झाले आहे. रेल्वे स्टेशन सुशोभिकीकरणाचे काम या विभागाने केले आहे त्याचे ११ कोटींचे टेंडर २० कोटींवर नेऊन अर्धवट काम करण्यात आले आहे. सणा सुदीला मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत आहेत त्यांच्याकरिता कोणतीही प्रवासी शेड स्थानकावर उभारण्यात आलेली नाही. सुशोभिकीकरणाच्या नावाखाली शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करण्याचे प्रकार या रेल्वे स्थानक सुशोभीकीकरण कामातून झालेला आहे असा आरोप सुभेदार यांनी केला. जिल्ह्यातील तिन्ही रेल्वे स्थानका मध्ये कित्येक सुविधांची वानवा आहे ते सोडून फक्त बाहेरील दिखावा करण्याची कामे करण्यात आलीत असेही ते म्हणाले.
ज्या प्रश्नी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील राजरोस पणे होणारा भ्रष्टाचार उघड केला तेव्हा पासुन त्यांना अधिकारी यांच्याकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे हिम्मत असेल तर गुन्हा दाखल करून दाखवा असा इशारा श्री सुभेदार यांनी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांना दिला. असे प्रकार जिल्ह्यात खपवून घेणार नाही वेळ पडल्यास जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारून हा भ्रष्टाचार पुवाराव्यानीशी बाहेर काढून त्यांना पुरुन उरू असा इशारा आशिष सुभेदार यांनी दिला आहे

You cannot copy content of this page