ग्रामस्थांना प्रवास करणे झाले मुश्किल; रस्ता दुरुस्तीची मागणी..
⚡कणकवली ता.१०-: मालवण तालुक्यातील असगणी गावातील तारभाटवाडी, टपालडुंगा मार्गे गावाच्या मुख्य रस्त्याशी जोडणारा रस्ता अतिशय खराब झालेला असून तेथे त्या रस्त्यावरील वाहतूक रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेले आहे.
शिवरायांच्या काळात रामगड ते सिद्धगड असे टपाल वाहतूक याच मार्गे होत होती. परंतु हा मार्ग पूर्णपणे उखडल्यामुळे असगणी गावाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ग्रामस्थांना गांवात आपल्या दैनंदिन कामासाठी जाणे कठीण झाले आहे. दुचाकी /चारचाकी वाहने सुद्धा जाऊ शकत नाही. परिणामी ग्रामपंचायत ऑफिस, तलाठी ऑफिस, शाळा, मंदिर येथे जाणे अवघड होऊन बसले आहे.
गावात जावयाचे असेल तर पूर्ण किर्लोस, शिरवंडे असा वळसा घालून यावे लागते. स्थानिक प्रशासन, राजकीय नेते मंडळी याबाबत उदासीन असून तारभाटवाडी या वाडीवरील वस्ती अत्यंत कमी असल्यामुळे गेली अनेक वर्ष राजकीय स्पर्धेमुळे सदर वाडीला ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व पण मिळाले नाही. परिणामी या वाडीला कोणी वाली नाही. आजारी पडल्यास,गरोदर महिला यांची गैरसोय होत आहे. ईश्वरावर भरवसा ठेवावा लागेल. अशी ग्रामस्थांची स्थिती झाली आहे. जर परिस्थिती मध्ये सुधारणा झाली नाही तर ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
