सतत हसमुख व्यक्तिमत्व…म्हणून निर्माण केली ओळख;स्वतःवर एकही डाग न लावून घेता झाले सेवानिवृत्त…
सावंतवाडी ता.०१-:* निसर्गाने भरभरुन दिलेले वन, पर्यावरण आदी जैवविधतेचे रक्षण करण्याबरोबर कायद्याला धरुन आपल्या कर्तव्यात कधीच कसूर न करता शासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत विविध योजना प्रत्यक्षात राबवून वनखात्यात नावलौकीत मिळविलेले सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर ३१ मे ला सेवानिवृत्त झाले, आज १ जूनला त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतांना त्यांच्या आजपर्यंतच्या सेवेचा ग्लोबल महाराष्ट्र चॅनेलकडून घेतलेला आढावा…..
वनअधिकारी म्हटल्यावर सतत आव्हाने मात्र आपल्या जबाबदारीतून कधीच न डगमगता आलेली आव्हाने झेलत सहाय्यक वनसंरक्षक पदापर्यंत श्री जळगावकर यांनी मजल मारली. मुळात नेहमी हसतमुख असणाऱ्या जळगावकर यांनी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन आपली वाटचाल सुरू केली यात ते नेहमीच यशस्वी झाले.
श्री जळगावकर हे १२ जानेवारी १९८४ पासून वनविभागात रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून सहाय्यक लागवड अधिकारी म्हणून रूजु झाले. सामाजिक वनीकरणमध्ये त्याचे सुरु झालेले कार्य पुढे अलिबाग नंतर रोहा, महाड असे रत्नागिरी जिल्ह्यात संपून ते पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे सहाय्यक वनसंरक्षक म्हणून ८ जुलै २०१९ ला येथे रुजू झाले. त्याच्या मृदू स्वभावाने त्यांनी सुरवातीपासूनच येथे सर्व कर्मचाऱ्यांना आपलेसे केले. मात्र असे असले तरी चुकीला कधीच माफ केले नाही. त्यामुळे जितके प्रेमळ तितकेच कामाच्या बाबतीत ते कडक होते.
सिंधुदुर्गातील जंगल सृष्टी वन्यजीव याचे संरक्षण करण्यासाठी त्यानी नेहमीच पुढाकार घेतला. सेवा बजावत असतांना टेबलावर कुठलेच काम पडून राहता कामा नये जे आहे ते ताबोडतोब झाले पाहीजे तसेच जर कोण काम घेऊन आला तर योग्य चुक बघून त्याचे काम तात्काळ करुन देण्यात त्याचा नेहमीच हातखंडा राहीला. त्यांच्या केलेल्या चर्चेत ते नेहमी म्हणायचे की आपण सावंतवाडीत येण्यास इच्छुक नव्हतो.सहा महिन्यांनी अन्यत्र बदली करण्यासाठी तयारी ठेवून ते सावंतवाडीत कार्यरत झाले. मात्र येथील माणसे, कर्मचारी, वरिष्ठ आणि सहचारिणीचा आग्रहामुळे त्यांनी कोरोना काळ असूनही तीन वर्षे उत्कृष्टपणे सेवा बजावली. सावंतवाडी येथे सहाय्यक वनसंरक्षक पदी रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक आणि प्रादेशिक अशा तीन पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. कर्मचाऱ्यांसोबत असलेला गोड स्वभावामुळे त्यांना त्याचे नेहमीच सहकार्य लागले त्यामुळेच तर ते तीन तीन जबाबदारी पेलू शकले. आपल्या आत्तापर्यंतच्या काळात शिकार प्रतिबंध तसेच वृक्षतोड बंदीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी वृक्षतोडी संदर्भात अनेक कारवाया केल्या. यात सावंतवाडी व जामसंडे येथील प्रकरणाचा त्यांनी छडा लावला. मनमिळावू स्वभाव, काम करण्याची वृत्ती समाधानाने काम करत असताना अत्यंत शांतपणे काम तडीस लावण्याची सवय असल्यामुळे त्यांच्याकडे आलेला माणूस किंवा तक्रारदार येताना रागाने आला, तर जाताना हसत जात असे.
शासकीय जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत असतांना त्यांनी आपल्या कुंटूबाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही कुटूंबाला त्यांनी नेहमीच वेळ दिला आज त्याचा एक मुलगा परदेशात नोकरी बजावत आहे तर एक मुला व्यवसायात स्थिर आहेत. त्यांनाही त्यांच्या कुटुंबियांची, अल्लाहाची नेहमीच साथ मिळाली. म्हणूनच आपल्या प्रदीर्घ सेवेत स्वतःला कुठलाही डाग लावून न घेता ते आज सेवानिवृत्त होत आहेत. यापुढील त्यांचे आयुष्य उत्तम व निरोगी राहो याच शुभेच्छा….!!!



