” गंभीर ” बाबीकडे निकषमय शासन लक्ष पूरविल काय ?
⚡वेंगुर्ला ता.०९-: पावसाळा तोंडावर आला असताना वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांना पाण्याचा मुबलक पुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील येथील पाणीपुरवठा करण्यासाठी आडेली ग्रामपंचायत मार्फत सुरु असलेले विहिरीचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांवर “पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ” आली आहे. नजिकच्या विहिरीत पाण्याचा तुरळक साठा असल्याने दूर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. तालुक्यात
पाणीटंचाई नसल्याचे सांगणाऱ्या शासनाला मात्र निश्चितच या गोष्टीचे कोणतेच गांभीर्य नसल्याचे समोर येत आहे. जनतेला विकासाची केवळ आश्वासने देणाऱ्या शासनाने “पाणीटंचाई निकष” स्पष्ट करावेत, अशी मागणी आहे. आडेली खूटवळवाडी कार्यक्षेत्रात स्ट्रीटलाईटचा पुरवठा गेली कित्येक कालावधी अनियमित होत असून कायम ” सामान्य दर्जाचे दिवे ” वापरण्यात येत आहेत. मठ कुडाळतिठा येथे एका व्यावसायिकाला पाच लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रकार अगदी दिवसा झाला असून नजिकच असलेल्या खूटवळवाडी भागात स्ट्रीटलाईट बंद असल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे. संबंधित शासनाने आडेली गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
