विद्यार्थ्यांनी साधला पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संवाद..
कुडाळ : बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या कॉफी विथ स्टुडन्ट या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या राजकारणातील सुरुवात ते जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर संवाद साधला विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना उत्तरे देऊन भविष्यातील सिंधुदुर्ग जिल्हा हा विकसित जिल्हा म्हणून ओळखला जाईल या ठिकाणच्या तरुणांना अन्यत्र कोणत्याही ठिकाणी नोकरीनिमित्त जावे लागणार नाही तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण या ठिकाणी दिले जाईल या व्यवस्था एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून उभ्या केल्या जातील असे विद्यार्थ्यांना मत्स्य व्यवसाय व बंदर तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी आश्वासित केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कॉफी विथ स्टुडन्ट कार्यक्रमात संवाद साधला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना विविध प्रश्न विचारले. यामध्ये प्रामुख्याने पालकमंत्री नितेश राणे यांना तुम्ही राजकारणात कसे आलात, हा प्रश्न विचारल्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मी लंडन येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याच ठिकाणी मला राहायचे होते पण वडिलांनी देशात येऊन काहीतरी करा असे सांगितल्यानंतर मी भारत देशात आलो आणि भारत देशात आल्यावर समाज सेवेपासून सुरुवात केली. नंतर मी राजकारणात आलो. राजकारणात आल्यावर इतर दरवाजे बंद झाले, म्हणून आता राजकारणात राहून जनसेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे, असे सांगितले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी रेशन कार्ड वरील उत्पन्न आणि शिक्षणासाठी लागणारे उत्पन्न, नर्सिंग विद्यार्थिनींसाठी मिळत नसलेले पास, एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे नसलेले केंद्र या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे स्थलांतर होणारे तरुण असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले, की शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची अट महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी रेशन कार्ड साठी असलेले रंग हे त्या योजनेसाठी पूरक ठरतात. त्यावरून उत्पन्न ठरतं. आता काही लोक श्रीमंत असून सुद्धा शासकीय योजनेचा लाभ घेता त्याला पर्याय नाही असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे यूपीएससी, एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लोकप्रतिनिधींबरोबरच समाजसेवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या कोकण विभागात असे विद्यार्थी तयार होणे काळाची गरज आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी हे विद्यार्थी घडतात. पण आपल्या कोकणात नाहीत आपण साक्षरतेत महाराष्ट्रात एक नंबरला आहोत. दहावी बारावी परीक्षांचे निकाल देशात प्रथम असतात. पण स्पर्धा परीक्षांमध्ये आम्ही का कमी पडतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. वेंगुर्ले आणि कणकवली येथे स्पर्धा परीक्षांचे केंद्र सुरू आहेत. याप्रकारे सर्वत्र सुरू व्हावे यासारखे आम्ही प्रयत्न करत आहोत असे त्यांनी सांगितले.
तसेच पालकमंत्री यांनी सांगितले की आपल्या जिल्ह्यात एसटी बस महत्त्वाच्या आहेत त्याच्या वेळा आणि छोट्या गावांमध्ये जाण्यासाठी मिनी बस या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच मिनी बस आपल्या जिल्ह्यात दाखल होतील. तसेच नर्सिंग विद्यार्थिनींसाठी पास मिळावा म्हणून परिवहनमंत्र्यांना विनंती करेन असे सांगून या ठिकाणीच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यांनी आपल्या आई-वडिलांसोबत याच ठिकाणी राहिलं पाहिजे. म्हणून प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगून पुढील काळात अनेक बदल झालेले दिसतील असे सांगून तुम्ही नर्सिंग क्षेत्रात काम करत असताना नर्सिंग पास झाल्यावर या जिल्ह्यात काम करण्यासाठी पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे असेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
