⚡मालवण ता.१२-: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे उभारताना त्यांनी केलेले कार्य समजून घेतले पाहिजे. नष्ट होणारे ग्रंथ संपदा, हस्तलिखित यांच्या प्रती संग्रह करून ठेवल्याने अहिल्याबाईंचा इतिहास आपल्याला समजतो. कर्तृत्वाचा, चरित्र्याचा आणि नेतृत्वाचा आदर्श ज्या श्रेष्ठ महिलेकडून घ्यावा अशी श्रेष्ठ स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर आहेत, असे प्रतिपादन सौ. ज्योती तोरसकर यांनी येथे बोलताना केले.
श्री शिवाजी वाचन मंदिर मालवण तर्फे आयोजित कै. श्रीपादजी वाघ पुरस्कृत आणि कै. राजाभाऊ भोसले स्मृती व्याख्यान कार्यक्रम दत्तमंदिर पटांगण भरड मालवण येथे संपन्न झाला. यावेळी लोकराज्ञी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्त सौ. ज्योती तोरसकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी धनगर समाजाचे अध्यक्ष श्री. भरत माने, वक्त्या सौ. ज्योती तोरसकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, विश्वस्त अध्यक्ष श्री. रुजारिओ पिंटो व संस्थेच्या कार्यवाह सौ. वैदेही जुवाटकर यांनी दीपप्रज्वलन केले. तर कु. वेदिका लुडबे व डॉ. दिघे यांनी हे हंस वाहिनी ज्ञान दायिनि हे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत माने आणि वक्त्या सौ. तोरसकर यांना गुलाबपुष्प व पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांचा परिचय श्री. विजय अटक यांनी करून दिला. तर प्रस्ताविक डॉ. दिघे यांनी केले.
यावेळी सौ. ज्योती तोरसकर यांनी आपल्या दर्जेदार व्याख्यानातून अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास मांडत त्यांचे तपस्विनी जीवन, राजकीय जीवन व कार्य याविषयी सविस्तर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी सावंत यांनी केले तर आभार सौ. वैदेही जुवाटकर यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.
