बांदा (प्रतिनिधी) :
डोंगरपाल येथील अत्यंत जागृत व संततीच्या नवसाला पावणारे देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री सिद्धपुरुषाचा भंडारा उत्सव उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री दर्शन घेत नवसफेड केली.
ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्याचप्रमाणे डोंगरपाल येथील सीधाचा डोंगरावर एका सिद्धपुरुषाने सुमारे ३०० वर्षांपूर्वी जिवंत समाधी घेतली. त्या ठिकाणी भंडारा पौर्णिमेला दरवर्षी उत्सव साजरा करण्यात येतो. संततीच्या नवसाला पावणारे देवस्थान अशी याची ख्याती आहे. नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर भागातील चाकरमान्यांसह गोव्यातील हजारो भाविक दाखल झाले होते.
यानिमित्त सकाळी पूजाअर्चा व धार्मिक विधी संपन्न झालेत. दुपारी महाप्रसाद, त्यानंतर स्वामी समर्थ मठ डोंगरपाल सेवेकरी यांचे भजन, सायंकाळी डोंगरपाल ग्रामस्थ, महिला व इच्छुक भाविकांचे भजन पार पडले. तसेच सायंकाळी डोंगरपाल श्री स्वामी समर्थ मठ यांचा हरिपाठ झाला. नवस बोलणे व फेडणे, भजन आदी कार्यक्रम सुरू होते. रात्री पावणी व भंडारा (महाप्रसाद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थान समितीने या उत्सवाचे नीटनेटके आयोजन केले होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
